जळगाव (प्रतिनिधी) वडिलांच्या निधनानंतर वारस म्हणून बँक खात्याचा हक्क घेतलेल्या संयोजिता मुदीत नागपाल (रा. मुंबई) या आयकर विभागात कार्यरत असलेल्या महिलेच्या जळगावातील बँक खात्यातून परस्पर २६ लाख रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील स्टार कुलर कंपनीचे संचालक प्रमोद गजानन चुरी यांचे काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेमध्ये खाते होते. त्यांचे १५ जानेवारी २०२३ रोजी व त्यांच्या पत्नी कल्पलता चुरी यांचे ३ मार्च २०२३ रोजी निधन झाले. प्रमोद चुरी यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाल्याने सदर बँक खात्याच्या वारस म्हणून मुलगी संयोजिता नागपाल यांनी हक्क मिळविला. त्या वेळी बँक खात्यात एक कोटी ४६ लाख ९२ हजार ८८२ रुपये होते. मुंबई येथे आयकर आयुक्त कार्यालयात नोकरीला असलेल्या संयोजिता यांनी या खात्यातून एक कोटी २२ लाख ४३ हजार ६७ रुपये काढून घेतले. काही दिवसांनी मुलीने बँक खाते तपासले असता त्यात ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शिरपूर शाखेतून प्रमोद चुरी यांच्या नावाने २०० रुपये जमा करण्यात आल्याचे दिसले. मात्र चुरी यांचे त्यापूर्वीच निधन झालेले असतानाही त्यांच्या नावाने ही रक्कम जमा झाली आहे. याच्या १० दिवसांनंतर लगेच २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सदर बँक खात्यातून गौरव सुनील तिवारी यांच्या नावे २६ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे बँक स्टेटमेंट दिसून आले.
सदर महिला मुंबई येथे राहत असल्याने त्यांनी हा प्रकार स्टार कुलर कंपनीमध्ये प्रमोद चुरी यांच्यासोबत संचालक असलेले व त्यांचे मित्र सुशीलकुमार असोपा यांना कळविला. तसेच याविषयी पोलिसांकडे तक्रार देण्याविषयी सांगितले. त्यानुसार असोपा यांनी ८ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करीत आहेत.