श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर दुसरीकडे, अनंतनाग जिल्ह्यातही सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनागच्या बिजबिहारामध्ये ही चकमक सुरू असून तेथे २ ते ३ दहशतवादी असल्याची माहिती आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, शोपियान जिल्ह्यातील हादीपुरा येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी करत तपासणी सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केली. यानंतर सुरक्षा दलाकडूनही या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आलं.
अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यात आणखी एक चकमक सुरू आहे. त्यांनी सांगितलं, की दक्षिण काश्मीरच्या या जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरातील सेमथानमध्ये दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलानं घेराबंदी करत तपासणी सुरू केली. यानंतर याठिकाणी चकमक सुरू झाली.
याआधी शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील एका मशिदीत दहशतवाद्यांनी प्रवेश केला होता. यावेळी सुरक्षाबलाने 5 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दक्षिण काश्मीरच्या अशांत शहरात प्रथमच २० वर्षांहून अधिक काळांनंतर पाच दहशतवाद्याना ठार करण्यात यश आलं. शोपियांमधील मशिदीत घेराव घालण्याची दहशतवाद्यांची पहिलीच वेळ होती. शोपियानमधील शेवटची मोठी चकमक १९९० च्या उत्तरार्धात झाली होती. त्यावेळी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.