मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदेंनी एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाच्या मदतीने बंडखोरी केली असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेने केला आहे. सर्व बंडखोर आमदारांना आधी सुरतला आणि तिथून गुवहाटीला नेण्यामागे या बांधकाम व्यवसायिकाचा मोठा हात होता. ‘सामना’च्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय बांधकाम व्यवसायिकाचा थेट उल्लेख करत निशाणा साधला आहे.
ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अजय आशर यांच्या नावाचा उल्लेख करत शिवसेनेनं मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं आहे. “एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते, पण महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल. बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाहीत, असा प्रश्न आम्ही विचारला तो त्यामुळेच. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे,” अशा खोचक शब्दांमध्ये शिवसेनेनं टीका केली आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांमधील जाणकार महाराष्ट्रात असताना नीती आयोगाप्रमाणे काम करण्याची अपेक्षा असलेल्या या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड कशी झाली असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. “नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच. महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ, आर्थिक क्षेत्रातील जाणकार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या अजय आशर यांना. अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी. ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात,” असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे.
कर्नाटकाच्या मुद्द्यावरून देखील दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. कर्नाटकने अरे केल्यास कारे ने उत्तर देऊ असं भाजपने म्हटलं आहे. हे भाजपचं ढोंग आहे. भाजपमध्ये तेवढी हिंत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून बोम्मईचे थोबाड रंगवले असते, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे. जे लोक शिवाजी महाराजांचा अवमान निमूटपणे सहन करतात ते कारे ची भाषा करतात हाच एक विनोद आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे चाळीस खोकेबाज आमदार आणि बिल्डर मित्रांसाठी सुरू आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. एखादे सरकार रामभरोसे चालत असते. मात्र, राज्यातील मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाला या गंडे दोरे ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिंदे फडणवीस सरकारने कानडी मुख्यमंत्र्यांच्या मनमानपुढे बुळचट धोरण स्वीकारले आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी उठून महाराष्ट्राला बेईज्जत करण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू केला आहे. विरोधी पक्षांना एकत्र वज्रमुठीचा ठोसा मारावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यात एकापेक्षा एक तज्ज्ञ आणि आर्थिक क्षेत्रातील जाणार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या संस्थेवर अजय आशर यांची नियुक्ती केली. अजय आशर यांच्यासाठीच ही संस्था काढल्याचं दिसत आहे. अजय आशर हे या खोके सरकारचे टेकू आहेत. म्हणूनच त्यांची नियुक्ती केल्याची टीकाही करण्यात आली आहे.