बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथील शेतकरी हा शंकर कृष्णा माळी (वय- ४० वर्ष, रा. माळी वाडा) याने काल संध्याकाळी राहत्या घरी आत्महत्या केली.
शंकर माळी यांच्यावर शेतीकर्ज सुमारे ६० हजार, कृषी सेवा केंद्राचे उधारी व बचत गटांचे एक लाख असे कर्ज आहे. यावर्षी सुरवातीला परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या शेती व पिकाचे झालेल्या नुकसानीत त्यांच्या कुटुंबाच्या पाच एकर शेतात सुद्धा नुकसान झाले होते. दुबार पेरणी नंतर मागील तीन आठवड्यात पावसाने ओढ दिल्याने पिकांची अवस्था सुद्धा समाधानकारक नव्हती. त्यामुळे कुटुंबाचे खर्च व कर्जफेडीबाबत नेहमी माळी हे चिंतेत राहत होते. त्याचेकडुन कर्ज फेडले जात नसल्याने त्यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेवून आत्महत्या केली, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. याप्रकरणी मयताचे भाऊ रघुनाथ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सचिन चौधरी हे करीत आहेत. मयत शंकर माळी यांचे पश्चात आई, वडील,भाऊ, पत्नी व दोन मुले आहेत.