
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात 25 वर्षांपूर्वी महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्य लेखनाचा प्रारंभीचा दिवस देशभर “आषाढस्य प्रथम दिवसे” म्हणून साजरा करण्यात येत असतो. हा कवितेचा दिवस असल्याने मराठी भाषेतील विविध कवींच्या कविता, गाणी या निमित्ताने परिवर्तनचे कलावंत सादर करत असतात. यापूर्वी अरुण कोलटकर, ना. धों. महानोर, बहिणाबाई, भालचंद्र नेमाडे, गुलजार, खानदेशी कविता यांच्या कवितांचे कार्यक्रम आषाढस्य प्रथम दिवसाच्या निमित्ताने सादर करण्यात आले आहे.
यावर्षी मराठीतील सुप्रसिद्ध कवी गीतकार मंगेश पाडगावकर यांच्या कविता आणि गाण्यांचा “तुझे गीत गाण्यासाठी…” हा कार्यक्रम परिवर्तनचे कलावंत सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. किशोर पवार यांची आहे, तर दिग्दर्शक डॉ. मनोज पाटील यांचे आहे. निर्मिती प्रमुख श्वेता गरुड व समृद्धी पाटील आहेत.
या कार्यक्रमात अंजली धुमाळ, अक्षय नेहे, लीना लेले, मानसी गगडाणी हे कलावंत सहभागी होणार आहेत. हर्षल पाटील हे निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार 15 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता अभियंता भवन, हतनुर सभागृहाजवळ, भाऊंच्या उद्यानाच्या पुढे महाबळ रोड या ठिकाणी होणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला असून रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवर्तन कार्याध्यक्ष नारायण बाविस्कर , उपाध्यक्ष मंजुषा भिडे यांनी केले आहे.
















