
जळगाव (प्रतिनिधी) – सहा दिवसांपूर्वी विवाह झालेली नववधू काकांसोबत दुचाकीने माहेरी जाण्यासाठी निघाली. परंतू पाळधीकडून जळगावकडे येणाऱ्या ओव्हरटेक करीत येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) या नववधूचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तिचे काका प्रवीण सुर्याजी पाटील (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार दि. १३ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर घडली, लग्नाच्या सहा दिवसातच विवाहितेवर दुर्देवी काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरातील देवराम नगरातील पोलीस अंमलदार विजय पाटील यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथील वैशाली पाटील यांचा दि. ७ जुलै रोजी मोठ्या धुमधडाक्यात विवाहसोहळा पार पडला. विवाहानंतर नवदाम्पत्य हे देवदर्शनासाठी गेले आणि दोन दिवसांपुर्वीच ते घरी परतले. नववधूला वैशाली हीला माहेरी घेवून जाण्याकरीता तिचे काका प्रवीण पाटील हे दुपारी जळगावला आले. जेवण आटोपल्यानंतर ते (एम.एच.१९-ईएच ०३०७) क्रमांकाच्या दुचाकीने कोळपिंप्री
काळजाचा थरकाप
जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पाळधीकडून जळगावकडे ओव्हरटेक करीत येत असलेल्या (एम.एच. ०२ बीटी-५९५८) क्रमांकाच्या भरधाव वाहनाने समोरुन जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की, यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या वैशाली पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे काका प्रवीण पाटील हे देखील गंभीररित्या जखमी झाले.
कुटुंबियांचा जिल्हा रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश
जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत वैशाली पाटील यांना मयत घोषीत केले तर त्यांच्या काका प्रवीण पाटील यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच वैशाली पाटील या नववधूच्या सासरच्यांसह माहेरच्या मंडळींनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांना वैशाली पाटील यांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांनी हंबरडा फोडीत एकच आक्रोश केला.
धडक देणारे वाहन पाळधी पोलिसांकडून जप्त
अपघातात मयत झालेली नववधू वैशाली पाटील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पती, सासू, सासरे असा परिवार आहे. पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुचाकीला धडक देणारे चारचाकी वाहन जप्त केले असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संसार फुलण्याआधीच जगाचा निरोप
वैशाली पाटील यांचे पती विजय पाटील हे पोलीस दलात कार्यरत आहे. सहा दिवसांपुर्वीच या नवदाम्पत्याच्या संसाराला सुरुवात झाली होती. परंतू सहा दिवसानंतर दुर्देवी काळाने नववधू असलेल्या वैशाली पाटील यांच्यावर झडप घालीत काही दिवसांपुर्वीच सुरु झालेला संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.
















