जळगाव (प्रतिनिधी) “व्यसन कोणतेही असो ते जीवाला घातक असते, व्यसनाधीन व्यक्तीची अवस्था बिकट होऊन त्याचे तो सर्वस्व हरपून बसतो. व्यसनाच्या गर्तेत गेलेल्यांना सुजाण नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आयुष्यात आशेचा ‘किरण’ कसा दिसेल, यासाठी प्रयत्नशील राहावे आणि जनजागृतीवर भर द्यावा” असे आवाहन चिंचपुरेचे मूळ रहिवासी व कवयित्री बहिणाबाईं चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. के.बी. (अण्णा) पाटील यांनी केले. पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे येथे चिंचपुरे विकास मंच आयोजित व्यसनमुक्ती शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कार्पोरेट ट्रेनर व प्रसिध्द समुपदेशक रागिब अहेमद , जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते , कलावंत तथा जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे यांची उपस्थिती होती. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर संतोष पाटील , व्यसनमुक्ती चळवळ राबविणारे माजी सुभेदार व विद्यापीठात कार्यरत समाधान हरी पाटील ,पोलीस पाटील भास्कर संतोष पाटील , माजी सरपंच भागवत पाटील , भगवान माधवराव पाटील , आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपुरेचे मुख्याध्यापक सुभाष देसले , जेष्ठ नागरिक उत्तम बाबुराव पाटील , माजी सैनिक रमेश कडू पाटील , सुभाष पांडुरंग पाटील , नाना सुपडू पाटील , नाना साहेबराव पाटील , विनोद पुंडलिक पाटील आदींची आवर्जून उपस्थिती होती.
समुपदेशक रागिब अहेमद प्रबोधन करताना म्हणाले , ” व्यसनामुळे मानसिक आणि शारीरिक आजार होतात. व्यसनामुळे भ्रम हा गंभीर आजार होतो.कुठल्या न कुठल्या कारणाने व्यसन सुटतच नाही.ज्याला व्यसनांपासून पूर्णतः मुक्त व्हायचे आहे, त्याने आधी मानसिक तयारी व सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. शासनाकडून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही.व्यसनाच्या नादात अनेक गुन्हे घडत आहेत.आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.कुटुंब उध्वस्त होत आहेत , ही चळवळ अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचेही प्रतिपादन करून त्यांनी अनेक उदाहरणे दिली.
“जगात ही चळवळ सामाजिक संस्था राबवितात , मात्र वेग मंदावला ” असल्याची खंत तुषार वाघुळदे यांनी व्यक्त करून ते पुढे म्हणाले,” बदलत्या जीवनशैलीमुळे पालकांना कामामुळे मुलांना वेळ देता येत नाही. पालक आणि मुलांमधील संवाद खूप कमी झालाय. अनेक शाळांमध्ये तर व्यसनी मुलांची ‘ गँग ‘ तयार झाली आहे ; ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. गुटखा, दारू, गांजा, तंबाखू, फेवीबॉड यामुळे ऐन तारुण्यात मुलांचे आयुष्य उध्वस्त होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे , समाजाने जनजागृतीचा विडा उचलून त्यांना परावृत्त कसे करता येईल , यासाठी ही चळवळ तीव्रपणे राबविणे महत्त्वाचे आहे ” असेही श्री.वाघुळदे यांनी ठामपणे सांगितले. एका अनामिक मद्यपीने या शिबिरात मद्याच्या आहारी गेल्यानंतर काय काय त्रास , समस्या सहन करावा लागल्यात , व जीवनात आलेले कटू अनुभव कथन केले.
या व्यसनमुक्ती शिबिरात रागिब अहेमद यांनी काही रुग्णांचे व्यक्तीगत समुपदेशन देखील केले. तसेच त्यांनी विविध शंका – कुशंकाचे निरसन केले. शिबिरात व्यसन सोडण्याच्या विविध औषधीही व्यसनींना देण्यात आल्या.गावकऱ्यांची आता एकजूट निर्माण झाली असून गावात कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे होणार नाहीत, अशी शपथही त्यांनी मागेच घेतली आहे. याबद्दल मान्यवरांनी आनंद व्यक्त करून कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवातीला शिक्षिका रेखा पाटील यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांनी दीपप्रज्वलित करून शिबिराचे उदघाटन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक देसले यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.