लातूर (वृत्तसंस्था) निलंगा मोटारसायकलवरून शेताकडे जात असलेले दोघे व रस्त्याच्या कडेने पायी चालत असलेली एक महिला अशा एकूण तिघा जणांना एका भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.१) सकाळी सहा वाजेच्या सुमारास निलंगा तालुक्यातील झरी येथे घडली.
निलंगा तालुक्यातील झरी येथील कृष्णा अर्जुन जाधव वय (वय २१) व कस्तुराबाई परमानंद जाधव (वय ३८) हे चुलती व पुतण्या दोघेही त्यांच्या दुचाकीवरून गुरुवारी (दि. १) सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेताकडे जात होते. तर अक्षराबाई किसनराव सूर्यवंशी (वय ५०) या रस्त्याच्या कडेने पायी प्रातः र्विधीसाठी जात होत्या. त्याचवेळी अचानकपणे उदगीरकडून निलंग्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने क्षणार्धातच तिघांनाही चिरडले.
ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक जागेवरच पलटी झाला. यात तिघेही ट्रकच्या खाली सापडले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाले. तिघेही पलटी झालेल्या कंटेनर खाली अडकुन बसले होते. या विचित्र अपघाताने रस्त्यावर रक्ताचा सडा व मासाचे तुकडे पडले होते. चिरडलेले मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. घटनास्थळी निलंगा पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी क्रेनच्या सहायाने ट्रक बाजूला घेण्यात आली. जवळपास तीन तास निलंगा-उदगीर रस्ता बंद करण्यात आला होता. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी निलंगा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. एकाच गावातील तिघांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वडीलांकडे हट्ट करुन कृष्णा जाधव यांनी नुकतेच आठ दिवसांपूर्वी नवीन दुचाकी खरेदी केली होती, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर झरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.