सांगली (वृत्तसंस्था) पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असतानाच वाटेतच भाविकांवर काळाने घाला घातला आहे. ट्रॅक्टर आणि बोलेरोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे गावचे आहेत.
दोन दिवसांपूर्वी मिरजेपासून सुरु झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी मिरजजवळ वड्डी गावाजवळ राँग साईडने विटांनी भरलेला ट्रॅक्टर चालक जात होता. याचवेळी पवार कुटुंबीय असलेली बोलेरो कार अत्यंत भरधाव वेगाने जाऊन ट्रॅक्टरला समोरुन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो ट्रॅक्टरमध्ये घुसली गेली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सरवडेमधील जयवंत पवार (वय 45 वर्षे) सोहम पवार (वय 12 वर्षे), कोमल शिंदे (वय 60 वर्षे), लखन शिंदे (वय 60 वर्षे) आणि बोलेरो चालकाचा समावेश आहे. जयवंत पवार यांच्या पत्नी आणि मुलगी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी देवदर्शनासाठी निघालेलं कुटुंब अपघातात गेल्याने सरवडे गावावर शोककळा पसरली आहे.