छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) दोन भरधाव दुचाकींची धडक झाल्याने चौघे रस्त्यावर फेकले गेले. याच दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ शिवारात शनिवारी (दि.३०) सायंकाळी हा अपघात घडला. मृतांमध्ये आकाश शिवाजी कांबळे (२६), कैलास एकनाथ कांबळे (४२, दोघे, रा. सांजखेडा, ता. छत्रपती संभाजीनगर) व प्रताप साळुबा बनसोडे (४०, रा. पिंप्रीराजा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. शंकर लक्ष्मण थोरात (रा. नागेवाडी, ता. जालना) हे गंभीर जखमी झाले आहेत. मृत कैलास व आकाश हे काका-पुतण्या आहेत.
शंकर थोरात (रा. नागेवडी, ता. जालना) हे करमाड- पिंप्रीराजा मार्गाने दुचाकी (एमएच २१ एई १६१३) वरून करमाड येथे येत होते. तर आकाश कांबळे (रा. सांजखेडा, ता. छत्रपती संभाजीनगर) हे शेंद्रा डीएमआयसीतून आपले काम आटोपून दुचाकी (एमएच २० इएम ०२६३) वरून ट्रिपलसीट करमाडहून पिंप्रीराजा मार्गे सांजखेडा येथे जात होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मंगरूळ शिवारात दोन्ही दुचाकी समोरासमोर भिडल्या. यावेळी झालेल्या भीषण अपघातात चौघेही रस्त्यावर फेकले गेले. दरम्यान, याचवेळी या मार्गावरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने तीन जणांना चिरडले.
अपघातानंतर ते वाहन पसार झाले. अपघातस्थळी रस्त्यावर अक्षरशः रक्तामांसाचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे सपोनि. प्रताप नवघरे, विजय जारवाल, विनोद खिल्लारे, शकुल बनकर यांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी आकाश कांबळे, कैलास कांबळे व प्रताप बनसोडे यांना मयत घोषित केले. जखमी शंकर थोरात यांच्यावर उपचार सुरू आहेत.