रत्नागिरी (वृत्तसंस्था) दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १२ जुलै आणि ३ जुलै रोजी घडला.
विसापूर गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (३४) हा दुपारी २:३० वाजण्याच्या सुमाराला बेपत्ता झाला. चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत कुंबळे (ता. मंडणगड) या ठिकाणी लाकडीपट्टी आणण्याकरिता जात आहे, असे सांगून घरातून निघून गेला. दुसऱ्याच दिवशी ३ जुलै रोजी त्याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमाराला मुलांना शाळेत सोडायला जाते, असे सांगून घरातून निघाली. आराध्य (७) व श्री (४) या आपल्या मुलांना मुगीज शाळा नंबर १ या जिल्हा परिषदेच्या शाळेत सोडायला गेल्या. पण त्या परतल्याच नसल्याने मोठी खळबळ उडाली. यामुळे नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी चौघांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तयार केले आहे.
एकाच घरातील चौघेजण बेपत्ता झाल्यामुळे यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची परिस्थिती नाही ना,याचा तपास करण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर आहे. पुढील तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे करत आहेत. दरम्यान, भरत यांना घरातून निघून जाण्याची सवय आहे. ते यापूर्वी पण असेच बेपत्ता झाले होते. पण यावेळी पत्नी आणि दोन लहान मुलंही बेपत्ता झाल्याने सगळेच नातेवाईक आणि ग्रामस्थ त्यांचा शोधाशोध घेत आहेत. नातेवाईकांनी आराध्य आणि श्री या चिमुकल्यांचा तसेच सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेताला. मात्र ते तिघेही सापडलेले नाहीत. तिच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.