नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरु आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आणि नवे कायदे मागे घेण्याची मागणी करत मोर्चा काढला जाणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला. यामुळे काँग्रेस नेत्यांनी १० जनपथ येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. पोलिसांनी कारवाई करत ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना हटवलं असून ताब्यात घेतलं. आंदोलनादरम्यान प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार दिशाभूल करु शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. “या सरकारविरोधात असणारे कोणतेही मतभेद दहशतवादाचे घटक असल्याचं सांगितलं जात,” असल्याची टीका त्यांनी केली आहे. दरम्यान राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी फक्त तीन नेत्यांना परवानगी दिली गेली आहे.
आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. मात्र लोकनियुक्त खासदारांना अडवले जात आहे. त्यांना राष्ट्रपतींची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. यात नेमकी समस्या काय? दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्यांचा आवाज ऐकण्यास तयार नाही. अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कृषी कायद्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप नेते आणि भाजपचे समर्थक देशद्रोही म्हणतात. यापेक्षा मोठं पाप असू शकत नाही, अशा शब्दात प्रियांका यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
















