अहमदाबाद (वृत्तसंस्था) अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २४ जुलै २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट ५६ जणांचा मृत्यू झाला होता. हा निकाल अत्यंत महत्वाचा मानला जातोय. अहमदाबादमधील २००८ च्या साखळी बॉम्बस्फोटांचा खटल्याचा निकाल जलदरित्या लावण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने ४९ पैकी ३८ दोषींना UAPA आणि IPC ३०२ च्या अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली. तर इतर ११ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अहमदाबादच्या विविध भागांमध्ये २००८ ला बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांच्या कोर्टाने १८ फेब्रुवारी ही निकालाची तारीख निश्चित केली होती. या प्रकरणी कोर्टाने आज निकाल दिला. २६ जुलै २००८ ला अहमदाबाद बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी हादरले होते. या प्रकरणी UAPA (अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट) अंतर्गत ७८ पैकी ४९ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. तपासात मदत केल्याबद्दल दोषींपैकी एक असलेल्या अयाज सय्यद याची निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. याशिवाय २९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
बॉम्बस्फोटांत ५६ जणांचा मृत्यू
अहमदाबादच्या बॉम्बस्फोटांमध्ये ७० मिनिटांत ५६ जणांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटांमध्ये २०० हून अधिक जण जखमी झाले होते. १३ वर्षांहून अधिक काळ कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. गेल्या आठवड्यात विशेष कोर्टाने ४९ जणांना दोषी ठरवले होते, तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख, गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये मदत द्यावी, असे कोर्टाने आदेश म्हटले आहे.
२९ बॉम्ब फुटलेच नाहीत
गुजरातच्या सुरत पोलिसांनी २८ जुलै ते ३१ जुलै २००८ दरम्यान शहराच्या विविध भागातून २९ बॉम्ब जप्त केले होते. त्यापैकी १७ बॉम्ब वराछा भागात आणि इतर कतारगाम, महिधरपुरा आणि उमरा भागात होते. चुकीचे सर्किट आणि डिटोनेटरमुळे या बॉम्बचा स्फोट होऊ शकला नसल्याचे तपासात समोर आले होते.
७७ आरोपींविरोधात खटला
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ७७ आरोपींविरुद्ध खटल्याची कार्यवाही पूर्ण केली होती. खटला सुरू असलेल्या ७८ आरोपींपैकी एक सरकारी साक्षीदार ठरला होता. हे आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. २००२ च्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता, असा आरोप करण्यात आला होता.
अवघ्या १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. यानंतर उर्वरित दहशतवादी देशातील विविध शहरांतून पकडण्यात आले. अहमदाबादमधील बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या याच टीमने जयपूर आणि वाराणसीमध्येही स्फोट घडवून आणले होते. देशातील अनेक राज्यांचे पोलीस त्यांना पकडण्यात गुंतले होते. पण ते एकामागून एक बॉम्बस्फोट करत गेले. अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जुलै २००८ ला सुरतमध्येही मालिका बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न होता. पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे ते स्फोट होऊ शकले नाहीत.
सुरतमध्ये १५ आणि अहमदाबादमध्ये २० तक्रारी दाखल झाल्या होत्या. देशातील विविध शहरांमधून एकूण ७८ जणांना अटक करण्यात आली होती. या स्फोटांत सहभागी असलेल्या अन्य ८ आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. या बॉम्बस्फोट मालिकेचा मास्टर माईंड यासीन भटकळ हा दिल्लीतील तुरुंगात तर अब्दुल सुभान उर्फ तौकीर हा कोचीन येथील तुरुंगात कैद आहे.
१३ वर्ष सुरु होती सुनावणी
८ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयानं या सर्वांना दोषी ठरवलं होतं. तर २८ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी १३ वर्षांपासून विशेष न्यायालयात सुरु होती. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटात ७८ आरोपी होते. एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला. त्यामुळे एकूण ७७ आरोपी होते. तब्बल १३ वर्ष चाललेल्या खटल्यात १,१६३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलीस आणि कायदेशीर यंत्रणांनी ६ हजारांहून अधिक पुरावे सादर केले होते.
अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी ६,७५२ पानांच्या निकालात ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर पुराव्याअभावी २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. दहशतवादाच्या आरोपात एकाच वेळी ४९ आरोपींना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोषींना आयपीसी कलम ३०२ (हत्या) आणि UAPA अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.
७० मिनिटांत २१ बॉम्बस्फोट
२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी ६.४५ वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर ७० मिनिटं आणखी २० बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. २००२ मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
दहशतवाद्यांनी टिफिनमध्ये बॉम्ब टाकून तो सायकलवर ठेवला होता. हे स्फोट गर्दीच्या आणि बाजारपेठेत झाले. इंडियन मुजाहिदीन (IM) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. स्फोटांच्या ५ मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता. ज्यामध्ये ‘तुम्हाला जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा.” असं लिहिलं होतं.