जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आशय आणि उद्देश’ या विषयावर प्रा. डॉ. दीपक एस. दलाल (कबचौउमवि) यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ अविनाश बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ एम एस पाटील, समन्वयक डॉ के बी पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा संजय पाटील आणि नॅक समन्वयक प्रा भागवत पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्रा भागवत पाटील यांनी केले. बहुभाषिकता, विषय निवडीचे स्वातंत्र्य, मातृभाषेतून शिक्षण, कला गुणांना वाव आणि विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्ये विकसित करुन त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणात आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ९० टक्के मार्क घेऊन पास होणारा विद्यार्थी इतकाच इतर कला गुण किंवा इतर बाबींमध्ये कौशल्य घेणारा विद्यार्थी देखील तोलामोलाचा असेल अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकून डॉ दिपक दलाल यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा आशय आणि उद्देश विद्यार्थी,पालक आणि प्राध्यापकांना अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितला.
अध्यक्षीय मनोगतात डॉ अविनाश बडगुजर यांनी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव त्यातून मिळणार आहे असे सांगितले. सुत्रसंचलन प्रा दिलराज पाटील यांनी तर आभारप्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा राजेंद्र चव्हाण यांनी केले. सदर चर्चासत्रात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.