
जळगाव (प्रतिनिधी) – पंढरपूर वारीसाठी फिरते शौचालय व बाथरूम उपलब्ध करून देण्याच्या ई-निविदा प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, ई-निविदा प्रक्रियेत संबंधित ठेकेदाराला झुकते माप देण्यासाठी निविदेतील अटी-शर्ती ठेकेदाराच्या सोयीने तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रक्रियेत टेंडर क्लर्क दीपक भोई आणि कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी कथितरित्या संबंधित ठेकेदाराला लाभ मिळवून देण्यासाठी भूमिका बजावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासाठी १० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चाही असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
याशिवाय, प्रत्यक्ष आवश्यकतेपेक्षा अधिक साहित्य, उपकरणे व इतर बाबींची नोंद करून शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण कामातील ई-निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), कार्यादेश, बिले, प्रत्यक्ष वापरलेले साहित्य तसेच देयकांची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशीत अनियमितता, नियमभंग किंवा आर्थिक गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशीही मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
















