
भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवाडे नगर परिसरात शनिवारी रात्री ऑन ड्युटी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत रेल्वे कर्मचारी प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) हे वांजोळा रोडवरील भारंबे कॉलनी, स्टार लॉनजवळ वास्तव्यास होते. ते रेल्वे विभागात कार्यरत असून घटनेच्या वेळी ते कर्तव्यावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वादातून घडला भयंकर प्रकार
प्राथमिक माहितीनुसार, कवाडे नगर परिसरात त्यांचा स्थानिक रहिवासी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर) याच्याशी काही कारणावरून वाद झाला. हा वाद सुरुवातीला शाब्दिक स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही क्षणांतच तो वाद विकोपाला जाऊन हाणामारीत रूपांतरित झाला. त्यानंतर संशयिताने जवळ असलेल्या लोखंडी पट्टीने कुलकर्णी यांच्या डोक्यावर जोरदार वार केल्याचे समोर आले आहे. गंभीर डोक्याच्या जखमांमुळे व अतिरक्तस्त्रावामुळे प्रसाद कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर सील करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी आकाश भानुदास गोरखा याला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
भंगार वादाचा संशय, विविध अंगांनी तपास सुरू
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भंगार संबंधित वादातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आर्थिक व वैयक्तिक वाद, तसेच परिसरातील पूर्वीचे तणाव अशा विविध अंगांनी तपास सुरू केला आहे.

















