अमळनेर (प्रतिनिधी) दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलांसह महिला आत्महत्या करायला निघाली होती. परंतु या महिलेला ११२ च्या कॉलमुळे पोलिसांचा आधार मिळाल्यामुळे सर्वांचे प्राण वाचले. यानंतर सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटाळे (ता.अमळनेर) येथील स्वप्नील विठ्ठल पाटील हा २१ मे रोजी पत्नी सोनाबाई पाटील (वय ३१) हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. पैसे दिले नाहीत म्हणून याने पत्नी सोनाबाईला शिवीगाळ करत मारहाण केली. एवढेच नव्हे तर १० वर्षाचा मुलगा आदित्य व चार वर्षांची मुलगी योगिता यांना देखील मारहाण केली. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून सोनाबाई पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी रिक्षावर जात होती. मात्र तिच्या पतीने रिक्षात बसू दिले नाही आणि रिक्षा परत पाठवली. त्यानंतर संतापाच्या भरात सोनाबाईने पायी रस्ता धरून रस्त्यात एका विहिरीत दोन्ही मुलांसह आत्महत्येचा निर्णय घेतला. एका व्यक्तीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
अखेर महिला दोन मुलांसह आत्महत्या करीत असल्याचा ११२ ला कॉल गेला. त्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ताबडतोब दीपक माळी व रवींद्र पाटील या पोलिसांना घटनास्थळी पाठवले. तोपर्यंत काही ग्रामस्थांनी सोनुबाईला थोपवून धरले होते. दोन्ही पोलिसांनी सोनूबाईचे मन परिवर्तन करून तक्रार करून घेण्याचे आश्वासन दिले. कौटुंबिक बाब असल्याने महिलेच्या तक्रारीवरून दारुड्या पती, दिर, सासू, नणंद यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.