जळगाव (प्रतिनिधी) – जून्या भांडणाच्या कारणासह
दुचाकीचे चाक पायाला लागल्यामुळे जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा होवून लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही गटातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आमोदा खु. फाट्याजवळ घडली. याप्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील घार्डी येथे राहणारे कैलास नारायण कोळी (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १० एप्रिल रोजी ते त्यांच्या गावाहून कानळदा जात होते. त्यावेळी आमोदे खु. फाट्याजवळ मागील लहान मुलांचे भांडणाच्या कारणावरुन कैलास कोळी व त्यांचा पुतण्या अमोल संजय कोळी या दोघांना रिधूर येथील संशयितांनी रस्त्यात अडवून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. जखमींनी तात्काळ जिल्हा रु ग्णालयात उपचार घेवून तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित परेश शरद पाटील, सोपान सुनिल कोळी, समाधान सुधाकर कोळी, दर्शन तुळशीराम कोळी, कमलाकर सुकदेव कोळी, सतिष लक्ष्मण कोळी (सर्व रा. रिधूर, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारुच्या नशेत केली बेदम मारहाण
दुसऱ्या गटातील समाधान सुधाकर पाटील (वय ३०, रा. रिधूर, ता. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, दि. १० रोजी अमोल कोळी यांच्या दुचाकीचे चाक हे समाधान पाटील यांच्या पायावरुन गेले. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने अमोल कोळी याने लाकडी दांडका त्यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच इतर पाच ते सहा जणांनी दारुच्या नशेत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत समाधान पाटील व कमलाकर कोळी हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित अमोल योगेश कोळी, संदीप अशोक कोळी, योगेश गोरख कोळी, रवी शंकर कोळी, कैलास नारायण कोळी, ज्ञानेश्वर सुभाष कोळी (सर्व रा. घार्डी, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















