जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय कृषी विकास योजना 2020-21 अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेतंर्गत रोपवाटिकेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या योजनेत टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिकेची उभारणी करायची असून यामध्ये 3.25 मी. उंचीचे Flat type शेडनेटगृह उभारणी, प्लॉस्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर व प्लॉस्टिक क्रेटस इत्यादी घटकांतर्गत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 50 टक्के प्रमाणे रु.2,30,000/- अनुदान देय राहील.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असलेल्या शेतक-यांनी दिनांक 2 ते 19 ऑक्टोबर, 2020 या कालावधीमध्ये Maha DBT या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.
लाभार्थी निवडीचे निकष
अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे, रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करतांना अर्जासोबत स्वत: 7/12 उतारा, 8-अ उतारा, आधारकार्ड, बॅक पासबुक, इत्यादी कागदपत्रे सादर करावीत, प्राप्त लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थी निवडीच्या प्राधान्यक्रमानुसार तालुकास्तरावर सोडत पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल.
महिला कृषी पदविकाधारकांना प्रथम प्राधान्य राहिल, महिला गट/महिला शेतकरी व्दितीय प्राधान्य राहिल, भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्पभुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहिल,
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक /कृषी पर्यवेक्षक/ मंडळ कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.