धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचे आगामी उमेदवार ठरू शकतात, अशी मोठी चर्चा सध्याच्या राजकीय वर्तुळात सुरु होती. पक्ष अडचणीत असल्यामुळे सध्या आपण फक्त संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतू आदेश मिळाल्यास निश्चित निवडणूक लढण्याबाबत विचार करू,अशी प्रतिक्रिया ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना श्री. चौधरी यांनी दिली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी वेळ असला तरी उद्योजक सुरेशनाना चौधरी यांच्याकडे आतापासून जळगाव लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार ठरू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. ‘द क्लिअर न्यूज’ ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर याबाबत तरी अधिकची चर्चा सुरु झाली होती. सोशल मिडीयावर सुरेशनाना यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळायला लागले होते. याच अनुषंगाने ‘द क्लिअर न्यूज’ माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांच्यासोबत संपर्क साधून या चर्चेत कितपत तथ्य असल्याची थेट विचारणा केली. त्यावर श्री. चौधरी यांनी पक्ष अडचणीत असल्यामुळे सध्या आपण फक्त संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीला बराच वेळ आहे. त्यामुळे यावर आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. सध्या आमच्या डोळ्यासमोर फक्त संघटन बांधणी हेच एक ध्येय आहे. परंतू लोकसभा निवडणूक लागल्यावर पक्षाने आदेश दिल्यास आपण शंभर टक्के याबाबत निश्चित विचार करू, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले. तसेच सोशल मिडीयावर आपल्या लोकसभेच्या बातमीवर लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असल्याबाबत विचारले असता, आपण राजकीय जीवनात जी काही पदं मिळवली, ती लोकांच्या ह्याच प्रेमामुळे मिळवली असल्याचे सांगत सर्वांचे मनापासून आभार मानत असल्याचेही श्री. चौधरी सांगितले.