मुंबई (वृत्तसंस्था) आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुडुचेरी, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. त्यासाठी, भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. कोरोना कालावधीत राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक घेणं आव्हान होतं. त्यानंतर, बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची मोठी प्रक्रिया आपण पार पाडली. त्यामुळे, आताही त्याच पद्धतीने ५ राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करू, असे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं. तसेच, आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० आणि पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.
तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी निवडणुकांसाठी मतदानप्रकिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच, आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचेही अरोरा यांनी सांगितलं.
पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण ८२४ मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडत असून १८.६८ कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, २.७ लाख मतदान बुथ केंद्र उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, पाच राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमासाठी मतदानाची एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. आसाममध्ये २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार, २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. तामिळनाडूत एका टप्प्यात मतदान होणार, ६ एप्रिल रोजी मतदान होईल, तर २ मे रोजी पाचही राज्यांच्या मतदानचा निकाल लागणार आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, ‘मागच्या वर्षी सर्व जगासमोर कोरोनाचे संकट उभे होते, तेव्हा जगभरातील निवडणूक आयोगांसमोर निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान होते. अनेक देशांनी अशा परिस्थिती हिम्मत दाखवली आणि सर्व नियमांचे पालन करुन निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या १८ जागांवर जून २०२० मध्ये निवडणुका घेऊन सुरुवात केली. आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बिहारचे होते. तिथे ७.३ कोटी मतदानर होते. ती आमच्यासाठी अग्निपरीक्षा होती.’