सिल्लोड (वृत्तसंस्था) मटन पार्टीत पीस कमी वाढल्यावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून मित्रानेच लोखंडी टॉमीने हातपाय तोडून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ३०) रोजी रात्री सिल्लोड तालुक्यातील धारला या गावात घडली. जितेंद्र काशीराम धुरवे (वय ३४, रा. हनुमंता टापू, ता. मुंडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे मयताचे तर ओमजयजगदीश सुरेश रघुवंशी / ठाकूर (वय ३५, रा. छोटी पोलिस लाइनजवळ, हरदा, मध्यप्रदेश) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, मध्यप्रदेशातील जितेंद्र धुर्वे व ओमजयजगदीश रघुवंशी हे दोघे मित्र होते. ते धारला येथील शेतकरी त्र्यंबक झाबू सोनवणे यांच्याकडे दोघांना शेतात सालदार म्हणून कामाला होते. या दोघांनी सोमवारी रात्री शेतात मटणाची पार्टीचा बेत आखला होता. दोघंही जण मद्य प्राशन करून मटण पार्टी रंगले होते. परंतू थोड्याच वेळात मटणाचे पिस कमी जास्त घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सुरु असताना शेतकरी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे यांनी दोघांची समजूत घालून घरी निघून गेलेत.
त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी ओमजयने संतापात जितेंद्रच्या हातपायसह डोक्यात रॉड टाकला. यामुळे जितेंद्र जागीच ठार झाला. यानंतर ओमजय शेजारी शेतात शांतपणे झोपून गेला. सकाळी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे हे शेतात आल्यावर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात जितेंद्रचा मृतदेह दिसला. याबाबत दोघांनी ओमजयला विचारले असता, त्याने मीच त्याचा खून केल्याचे सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि आरोपी ओमजयला अटक केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.