भडगाव (प्रतिनिधी) जामदा नदीच्या कालव्यात जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे (रा. गणेशपुरा, ता. साक्री) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
गावापासून काही अंतरावर जामदा डावा कालवा गेला आहे. मयूरच्या मामांची शेती कालव्याला लागून आहे. मयूर हा सुटीच्या दिवशी मामांना मदत म्हणून शेतात जात होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मयूर बैलांना पाणी पाजण्यासाठी कालव्यावर गेला. यावेळी पाय घसरल्याने तो कालव्यात वाहून गेला. त्याला पोहता येत नसल्यामुळे थोड्याच वेळात तो बुडाला. बराच वेळ झाल्यानंतरही मयूर परत न आल्याने शोधाशोध केली. तेव्हा काही अंतरावर तो सापडला. गावकऱ्यांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
परीक्षा संपल्यावर जाणार होता आई-वडिलांकडे !
मयुर बीएससीच्या शेवटच्या वर्षाला असल्यामुळे तो परीक्षा संपल्यावर दोन दिवसात आई वडिलांकडे जाणार होता, परंतु, आई – वडिलांची भेट अधुरीच राहिली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे. कॉ. कैलास गीते व दत्ता मगर करत आहेत.
एकुलता मुलगा
गणेशपुरा, ता. साक्री, जि. धुळे येथील नरेंद्रसिंग ठाकरे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. नरेंद्र हा घरातील मोठा मुलगा होता. शिक्षणासाठी त्याला आई-वडिलांनी आजी-आजोबा आणि मामांकडे ठेवले होते. तो १०वीपासून येथे शिक्षण घेत होता. आई-वडील अंबरनाथ (जि. ठाणे) येथे वास्तव्या होते. तो पाटील महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला होता.