जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात ११ संशयितांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी ११ जणांना अटक केली होती. पुणे विशेष न्यायालयाने त्यांना १४ जुलै रोजी तात्पुरता जामीन मंजूर केला होता. परंतू सर्वाना पावत्यांची २० टक्के रक्कम १० दिवसांच्या आत भरण्याची अट होती. त्यानुसार सर्व संशयित कर्जदारांनी २० टक्के रक्कम भरुन कारागृहातून टप्प्याटप्प्याने सुटका करुन घेतली आहे.
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी ११ जणांना अटक केली होती. सर्व संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणी होऊन विशेष न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार १५ आॅक्टोबर २०२१ पर्यंत परतफेड करायच्या ४० टक्के रकमेपैकी २० टक्के रक्कम १० दिवसांत जमा करण्याची प्रमुख अट होती. या अटींनुसार सर्वांनी पैसे भरुन सुटका करुन घेतली आहे. सुटका झालेल्यांमध्ये भागवत भंगाळे, दाळ उद्योजक प्रेम नारायण कोगटा, अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रीतेश चंपालाल जैन (धुळे) यांचा समावेश आहे.