जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील पावती एजंट अनिल रमेशचंद पगारीया याचा अटकपुर्व जामीन अर्ज बुधवारी पुणे न्यायालयाने फेटाळुन लावला. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज महावीर जैनने मागे घेतला आहे.
बीएचआर घोटाळ्यातील पावती एजंट अनिल रमेशचंद पगारीया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बीएचआर घोटाळ्याचे तीन गुन्हे पुण्यातील डेक्कन, शिक्रापुर व आळंदी पाेलिस ठाण्यात दाखल आहेत. यातील डेक्कन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ रोजी दोषारोपपत्र सादर केले. याच गुन्ह्यात अनिल पगारीया याने अटकपुर्व जामीन मागीतला होता. त्यावर न्यायाधिश एस. एस. गोसावी यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला.
दरम्यान, पगारीया याने जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर, महावीर जैन, विवेक ठाकरे यांच्यासोबत संगनमत करुन अनेक ठेवीदारांची दिशाभुल केली. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग करुन देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. ३० टक्के रक्कम ठेऊन घेत ठेवीदारांना ठेवीतील ७० टक्के पैसे परत करण्याचे काम त्याने केले आहे. त्यामुळे बीएचआरसह ठेवीदारांचे नुकसान झाले. तर कर्जदारांना बेकायदेशीरपणे लाभ मिळवुन दिला आहे. असा युक्तीवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण व त्रयस्त अर्जदार अॅड. अक्षता नायक यांनी केला. युक्तीवादाअंती न्यायालयाने पगारीया याचा अटकपुर्व जामीनअर्ज फेटाळला आहे.
दरम्यान, सीए महावीर जैन याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश कोतवाल यांच्या न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार होती. तत्पूर्वी जैन याने जामीन अर्ज माघारी घेतला.