जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींपैकी ९ संशयितांनी पुणे न्यायालयात २४ जूनला जामीन अर्ज दाखल होता. त्यावर सरकारी पक्षाने आपले म्हणणे सादर केल्यानंतर आज जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. यावेळी घोटाळयाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. एवढेच नव्हे तर, आमच्याकडे कुठलीही थकबाकी असल्यास आम्ही भरायला तयार असल्याचे आरोपी पक्षाने न्यायालयास सांगितले.
आज (शुक्रवारी) जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या जामीन अर्जावर सुनवाई झाली. यावेळी जयश्री तोतला यांच्या वकिलाने घोटाळयाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. आम्ही नियमाप्रमाणे कर्ज भरलेले आहे. ३० टक्क्यात पावत्या मॅचिंग कशा झाल्या?, याबाबत कंडारेलाच माहिती असलल्याचा युक्तिवाद केला. संशयीतांचा घोटाळ्याशी काहीही संबंध नाहीय. पोलिसांनी केलेली अटक चुकीची आहे. फिर्यादीत आरोपी म्हणून उल्लेख नसतांना बेकायदेशीर अटक केली गेली. तर दुसरीकडे कर्ज घेणे हा गुन्हा नाहीय. आमच्याकडे थकबाकी असल्यास न्यायालयाच्या सुचनेप्रमाणे भरण्यास तयार असल्याचे इतर संशयितांच्या वकिलाने न्यायालयास सांगितले. दरम्यान, या तिघांसोबत उर्वरित संशयितांच्या जामीन अर्जावर आता ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
बीएचआर मधील साधारण १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२० आणि २०२१ अशा दोन वेळी राज्यात छापेमारी करून बीएचआर घोटाळ्यातील संशयितांना अटक केली आहे. यातील १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे) या ९ संशयितांनी जामिन अर्ज दाखल केले होते. तर यापैकी जयश्री तोतला आणि जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने २५ जून आधीच फेटाळून लावलेला आहे. दरम्यान, दुसरीकडे मुख्य सूत्रधार सुनील झंवरचा अनेकदा अटकपूर्व जामीन फेटाळलेला असतानाही त्याने पुन्हा एकदा पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेला आहे. न्यायमूर्ती एस एस गोसावी यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर कामकाज सुरु आहे.
विजय वाघमारे (9284058683)
















