जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे.
बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरला २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयाने तब्बल ११ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. सुरज झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ जानेवारीला सायंकाळी अटक केली होती. दुसऱ्या दिवसही त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने विविध बँकांना सुरज झंवर व कुटुंबियांच्या बँक खात्यांची माहिती घेण्यासाठी तसेच ती खाती गोठविण्यासाठी काही बँकांना पत्र दिले होते. परंतू सुरज झवरने बँक खाती गोठवू नका म्हणून बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. दरम्यान, सुरजने संगनमत करून पुणे, निगडी आणि नशिराबाद येथील करोडोच्या मालमत्ता कवडीमोल दरात खरेदी केल्याचेही पोलीस तपासात समोर आले होते.
दुसरीकडे सुनील झंवरने पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण येत वॉरंट रद्द केले असून त्याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे जितेंद्र कंडारे याने अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर पाच मार्चला पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण आला. त्याने फरार घोषित होण्याचे वॉरंट रद्द करून घेतले. तर दुसरा मुख्य संशयित आरोपी तथा बीएचआरचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सुनील झंवरला दोन मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून बचावासाठी १५ दिवसांचा दिलासा दिला. झंवर याने १५ दिवसांच्या आत पुण्याच्या सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून सुनावणीसाठी मुदत देण्यात आली. तर दुसरीकडे पुण्याच्या न्यायालयाने झंवर व कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी घोषणापत्र जारी केले होते. या घोषणापत्रानुसार ३० दिवसांच्या आत म्हणजेच १४ मार्चपर्यंत दोघांना न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढले होते. या वॉरंटची मुदत येणाऱ्या आठवड्यात संपुष्टात आल्यानंतर दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते, असे झाल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असती. तत्पूर्वी झंवर याने पाच मार्च रोजी पुण्याच्या न्यायालयात स्वत: हजर राहून वॉरंट रद्द करून घेतले. झंवर याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.