जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींपैकी ९ जणांनी पुणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. यापैकी जयश्री तोतला आणि जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. दरम्यान, संशयित आरोपींना हा जोरदार झटका मानला जात आहे.
बीएचआर मधील साधारण १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२० आणि २०२१ अशा दोन वेळी राज्यात छापेमारी करून बीएचअआर घोटाळ्यातील संशयितांना अटक केली आहे. यातील १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे) या ९ संशयितांनी जामिन अर्ज दाखल केले होते. परंतू आज जामीन अर्जावर कामकाज होणार नव्हते. त्यावर आमच्या जामीन अर्जावर आजच सुनावणी घेण्यात यावी, असा आग्रह जयश्री तोतला आणि जयश्री मणियार यांचे वकील आर.एफ. तोतला यांनी धरला.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाकडून ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी जोरदार युक्तिवाद करत जामीन फेटाळण्याची मागणी केली. त्यावर न्यायमूर्ती एस एस गोसावी यांनी संशयित आरोपींवर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्यामुळे जामीन देता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत अंतरिम जामीन फेटाळून लावला. त्यामुळे संशयितांना हा जोरदार झटका मानला जात आहे. दुसरीकडे मुख्य सूत्रधार सुनील झंवरचा अनेकदा अटकपूर्व जामीन फेटाळलेला असतानाही त्याने पुन्हा एकदा पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली आहे. दरम्यान, आता सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.