जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे या दोघे तीस दिवसात पोलिसांकडे हजर न झाल्यास त्यांना फरार घोषित करण्यात येणार आहे. याबाबत आज न्यायालयाने आदेश दिले आहेत.
बीएचआर प्रकरणात फौजदारी संहिता तरतुदीनुसार सुनील झंवर आणि जितेंद्र खंडारे यांच्या विरुद्ध यापूर्वी स्टॅंडिंग वॉरंट निघाले होते. परंतू तरी आरोपी मिळून न आल्याने या आरोपींविरुद्ध पुणे आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली असून आज या संदर्भात पुणे विशेष कोर्टात जिल्हा न्यायमूर्ती एस.एस.गोसावी यांनी सुनील झंवर व जितेंद्र खंडारे यांना कोर्टात मुदतीत हजर न झाल्यास फरार घोषित करण्याबाबत घोषणापत्र प्रसिद्ध करण्यासाठी आदेश केले आहेत.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे हे दोघे गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता होते. पुणे आर्थिक गुन्हे शाखेची दोन-तीन पथके राज्यभर त्यांचा शोध घेत आहेत. परंतू दोघे मिळून येत नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे या दोघांना फरार घोषित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे या दोघांना हजर होण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.
दरम्यान, नुकतेच सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. तर बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी धरम सांखला, सीए महावीर जैन, सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होते. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यात नोव्हेंबर २०२० मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे हे बेपत्ता आहेत. आता ३० दिवसाच्या आत दोघे पोलिसांना शरण न आल्यास त्यांना फरार घोषित केले जाणार आहे.