मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असं भाकित केलं होते. तसेच, भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेतेमंडळी वर्षभर करताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना एक आव्हान दिलं.
“भाजपाचे २० आमदार आमच्या पक्षात येणार असं काही लोकं सांगतात. २० तर सोडाच, पण १२ महिन्याचे १२ आमदारही तुम्हाला फोडता आले नाहीत. आम्ही लिहून देतो की आमचे जे आमदार तुमच्या पक्षात यायला तयार असतील, त्या आमदारांची आणि तुमची मिटींग आम्हीच घडवून देतो. तुम्हाला तुमच्या बळावर खूप विश्वास असला तरी आम्हाला आमच्या विचारांवर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे”, असेही मुनगंटीवार म्हणाले. भाजपाचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. याबाबत टीव्हीनाईनशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले,”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही अद्याप भाजपाचा एकही आमदार फोडू शकला नाहीत. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही”, असं थेट आव्हान त्यांनी अजित पवारांना दिलं.
















