बुलढाणा (वृत्तसंस्था) शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपा नेत्यांमधला कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. यातच शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. भाजपाचे संजय कुटेसारखा तीनपाट आमदार दिवसभर दारू पिऊन वावरात पडलेला असतो. माझा पुतळा काय जाळतो, हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो, असे खुले आवाहन शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले.
वाढता कोरोना, केंद्र सरकारने न केलेली मदत, ऑक्सिजनचा तुटवडा यावर मी एक व्हिडीओ बनवला होता. त्यावर भाजपकडून माझा पुतळ्याची जाळपोळ करण्यात आली. पण माझा यात काय दोष आहे? मी फक्त यावरची वस्तूस्थिती मांडली. केंद्राने मदत करायला हवी, ऑक्सिजन द्यायला हवा, रेमडेसिवीर दिलं पाहिजे. मात्र राज्यात आज फक्त शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. म्हणून केंद्र हे पुरवत नाही.
सर्व भारतातील लोक एका पक्षातील आहेत का? यात सर्व धर्मातील सर्व पक्षातील लोक आहेत. मग या राज्यात केवळ मुख्यमंत्री आपला नाही, म्हणून अडवणूक करता. पाकिस्तान, बांगलादेश यांना पुरवता. पण भारताला पुरवत नाही. उत्तरप्रदेशात तुम्ही रेमडेसिवीर फुकट वाटता. पण महाराष्ट्राला जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला आहे.
ज्या भाजपने आणि संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. त्याला सर्व शौक आहे. तो मला मवाली आहे. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो. तुझ्या मायने दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव. तुला संजय गायकवाड दाखवतो काय आहे, असे थेट आवाहन संजय गायकवाड यांनी केले.
पुतळे जाळले म्हणजे काय मोठं केलं का, मी जी भावना मांडली ती सर्व जनतेची आहे. हा महाराष्ट्र जिजाऊ-शिवरायांचा आहे. ज्या महाराष्ट्रातील शिवरायांचे वंशज जर तुम्ही मारत असाल, तर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तुम्ही माझी काय तक्रार करता, मीच भाजपच्या सर्व लोकांविरुद्ध तक्रार करतो. या भाजपमुळे राज्यातील लोक मरु लागले आहेत तुम्ही काय आंदोलन करता? तुमच्या या प्रवृत्तीमुळे माझा महाराष्ट्र मरतो आहे. माझी लोक मरत आहेत. याला तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही काय उपोषण करता मीही आंदोलन करेन, असेही संजय गायकवाड म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
‘संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी. मात्र मी त्यांना विनंती करतो की, माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँड ग्लोज घालावेत आणि चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. कारण काय आहे की, मला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.