नाशिक (वृत्तसंस्था) मुख्यमंत्र्यांवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी नाशिक येथे राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांनी राणे यांना अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआर्शीवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. शिवसेना नेते, कार्यकर्त्यांनी त्याबाबत राणे यांना आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर काल रात्री उशीरा शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिस आयुक्तांनी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली. शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पहावं लागणार आहे.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
तिसऱ्या लाटेचा आवाज त्यांना कुठून आला? आणि ती सुद्धा लहान मुलांना धोका आहे म्हणायचे आणि लोकांना घाबरवायचे. अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल म्हणावे. त्या दिवशी नाही का, किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय, देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.