
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव येथे झालेल्या वादाच्या प्रकरणात दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही प्रमुख संशयित आरोपींना अटक झाली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी सायंकाळी जलतरण तलाव येथे किसनराव यशवंत जोर्वेकर (रा. साईधाम, भडगाव रोड, चाळीसगाव) आणि श्याम उर्फ अण्णा नारायण गवळी (रा. अभिनव शाळेसमोर, भडगाव रोड, चाळीसगाव) यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारींच्या चौकशीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा क्रमांक ३१३ / २०२६ आणि ३१४/२०२६ नोंदविले आहेत. किसनराव जोर्वेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत, श्याम गवळी यांनी पूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा राग मनात धरून जलतरण तलावात हातपाय पकडून खोल पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर श्याम गवळी यांनी आपल्या फिर्यादीत, ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार केल्याच्या कारणावरून किसनराव जोर्वेकर यांनी जलतरण तलावात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच घरी परतत असताना महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे यांनी रस्ता अडवून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणात किसनराव जोर्वेकर यांच्या फिर्यादीवरून श्याम गवळी यांच्याविरुद्ध, तर श्याम गवळी यांच्या फिर्यादीवरून किसनराव जोर्वेकर, महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी किसनराव जोर्वेकर आणि श्याम उर्फ अण्णा गवळी या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
















