
चाळीसगाव (प्रतिनिधी) – गाडी सोडविण्यासाठी पैशांच्या वादातून करणसिंग रामसिंग वंजारी (वय ४५, रा. आंबेहोळ, ता. चाळीसगाव) यांच्या डोक्यात सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप मारला. त्यानंतर दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथील करणसिंग वंजारी हे वास्तव्यास होते. दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गावातील काही नागरिकांनी करणसिंग वंजारी यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी पोलीस पाटील रमेश चरणसिंग राठोड हे त्यांच्या घरात गेले असता, त्यांना करणसिंग हे जमिनीवर निपचित अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी होती, तर डोक्याखाली तसेच आजूबाजूला रक्त सांडलेले असल्याचे दिसून आले. तसेच घरात करणसिंग यांची पत्नी आणि मुलगा विशाल हा देखील होता. घराची पाहणी केल्यानंतर छताला कुठेही दोरी नसल्याचे दिसल्याने करणसिंग यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पत्त्यांसह दारुचे व्यसनातून कुटुंबियांशी वाद
पोलीस पाटील रमेश राठोड यांनी घटनेची माहिती तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पत्नी अरुणाबाई व मुलगा विशाल यांच्याकडे चौकशी केली असता, करणसिंग यांना पत्ते खेळण्याचे व दारू पिण्याचे व्यसन होते आणि पैशांवरून ते कुटुंबीयांशी वाद घालत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलासह पत्नीने आवळला दोरीने गळा
घटनेच्या दिवशी करणसिंग यांनी गावातील एका व्यक्तीकडे गाडी गहाण ठेवल्याचे आणि ती सोडविण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे सांगण्यात आले. पैसे न दिल्याने वाद व झटापट झाली. त्यावेळी मुलगा विशाल याने सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप करणसिंग यांच्या डोक्यात मारल्यामुळे खाली कोसळले. त्यानंतर अरुणाबाई व विशाल यांनी दोरीने गळा आवळल्याचे पोलिसांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
गुन्हा दाखलनंतर दोघांना अटक या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, पत्नी व मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच घटनेमागील नेमके कारण, पुरावे आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे

















