मुंबई (वृत्तसंस्था) मानदुखीचा त्रास वाढल्याने रिलायन्सच्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसंच, डॉक्टरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजचा मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती. तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू होणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचं मुख्यमंत्र्यांचं निवेदन
मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. “गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल”, अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केले होते.