सोलापूर (वृत्तसंस्था) नांदेडमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने सोलापुरातील आपल्या राहत्या घरात स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांची आत्महत्या ही कामाचा ताण व वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी वाचून तर अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. आनंद मळाळे, असे आत्महत्या केलेले सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
गेल्या महिनाभरापासून आजारी रजेवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले. ही घटना आनंद मळाले यांच्या राहत्या घरात पहाटे चारच्या सुमारास घडली. एका प्रकरणाचा तपास करून पोलीस मुख्यालयाकडे परतत असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यात जबडा फाटल्याने नांदेड येथे उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता सोलापुरात पाठवण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून ते घरीच उपचार घेत होते. परंतु ते सातत्याने तणावात असल्याचे दिसून येत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याने आता कुटुंबीयांनी वरिष्ठांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली आहे. यात त्यांनी वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासाबाबत आपल्या भावना मांडल्या आहेत. कामाचा ताण व वरिष्ठांकडून होत असलेला आरोप यामुळे मानसिक संतुलन ढळल्याने सपोनि आनंद मळाले यांनी गोळी झाडून जीवन संपवले. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.
आनंद मळाले हे मूळचे सोलापूरचे. पण सध्या नांदेड येथे कार्यरत होते. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्षे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम पाहिले होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार याठिकाणी सेवा बजावली. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.
बिलोली पोलीस ठाण्यात नेमणुकीवर आल्यावर वेळेवर पोलीस मदत न मिळणे, तपासाला दिलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होणे, कोणत्याही प्रकारचा मदतनीस गुन्ह्याच्या तपासकामी न देणे, जातीयदृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोपपत्र पाठवणे आवश्यक असणारे गुन्हे तपासाला देणे यांसारख्या गोष्टी त्यांच्याबाबतीत सातत्याने घडत आहेत, अशी त्यांची धारणा होती. वरिष्ठांकडून मदत न होता सातत्याने त्रास होत होता. गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा, दिरंगाई, आरोपीला मदत होईल, असे कार्य केले म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून त्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, त्यामुळे ते निराश झाले होते.
ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचा आहे ऋणी !
‘बॅचमेट’ विषयी चिठ्ठीत लिहिले आहे की, माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मोलाची साथ दिली, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझ्या पश्चात पत्नी व माझा मुलगा यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये, ही माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे.
चिमू आणि पिल्लू मला माफ करा !
‘चिमू आणि पिल्लू मला माफ करा, मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान देऊ शकलो नाही. अपेक्षा करतो की, माझ्या पश्चात तुम्ही दोघेही जीवाचे रान करून चांगल्या भवितव्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे अनेक शुभाशीर्वाद, उज्ज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चिमू मला माफ कर…’, असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.