जळगाव (प्रतिनिधी) वसीम रिजवी व पुस्तक प्रकाशक या दोघांनी मोहम्मद या नावाने एक वादग्रस्त पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन केले. यामुळे जगभरातल्या तमाम मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून वसीम रिजवी व पुस्तक प्रकाशक याच्याविरोधात शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक व शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
पवित्र इस्लाम धर्म हा सर्वसमावेशक असून जातीय वाद, भेदभाव, भाषावाद, प्रांतवादला इस्लाम धर्मात थारा नाही. असे असताना सुद्धा लखनऊ उत्तर प्रदेश येथील एक माथेफिरू समाजकंटक वसीम रिजवी हा नेहमी जाणून बुजून इस्लाम धर्मा बाबतीत चुकीच्या व खोट्या गोष्टी सांगून दूष प्रचार करत असतो. अशाच प्रकारे वसीम रिजवी याने अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर मोहम्मद या नावाने एक वादग्रस्त पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन केले. त्यात पवित्र इस्लाम धर्म, अल्लाह, प्रेषित, कुरान व शरिअत (इस्लामी कायदे) यांच्याविषयी आकाश बुद्धीने अत्यंत चुकीची माहिती लिहून खालच्या स्तरावर जाऊन लिखाण केलेले असून पुस्तक प्रकाशनावेळी सुद्धा आक्षेपार्ह विधान केले. यामुळे जगभरातल्या तमाम मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन सर्व मुस्लिम समाज व्यथीत झाला आहे.
तसेच या पुस्तकामुळे इस्लाम धर्माबाबत सर्वत्र गैरसमज निर्माण होऊन दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. म्हणून मोहम्मद या पुस्तकाचा लेखक वसीम रिजवी व त्या पुस्तकाच्या प्रकाशक या दोन्ही आरोपींन विरुद्ध भा. दं. वि. कलम 153 (अ), 153 (ब), 295 (अ), 298, 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच या दोघा आरोपींना भविष्यात असे कृत्य करण्यापासून अटकाव करण्यासाठी तसेच या वादग्रस्त पुस्तकावर लवकरात लवकर बंदी घालण्यात यावी, म्हणून आज जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक व शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार दिली. तसेच शनिपेठ पोलीस स्थानकात दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रसंगी तक्रारदार तसेच सून्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सून्नी जामा मस्जिद जळगावचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली, रफिक कुरेशी, सय्यद जावेद, अहेमद खान, सय्यद उमर, नाझीम कुरेशी, विकार शेख इत्यादी उपस्थित होते. तसेच सदर दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास तसेच या वादग्रस्त पुस्तकावर बंदी न घातली गेल्यास संपूर्ण भारतातील मुस्लीम समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, यास सर्वस्वी दोन्ही आरोपी व सरकार व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सुन्नी मुस्लिम बांधवांनी दिला आहे.