मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसनं आपला उमेदवार घोषित केला आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाली होती.
उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेट मधील एक नेत्या अशीही त्यांची ओळख आहे. युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र रजनी पाटील यांना संधी देऊन काँग्रेसने एका महिला नेत्याला संधी दिली आहे. रजनी पाटील ह्या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या त्या सांगली जिल्ह्यातल्या. पुढे विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थाईक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख २१ सप्टेंबर आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या ४ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत.