धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग आणि मराठी विभाग यांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ११ ऑगस्ट रोजी बहिणाबाईंच्या कवितांची काव्यवाचन स्पर्धा आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ता म्हणून महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रविण बोरसे तर अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य प्रा. एस. एस. पालखे उपस्थित होते. डॉ. बोरसे यांनी तक्षशिला, नालंदा विद्यापीठांच्या परंपरेसह ‘विद्यापीठ’ ही संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. तसेच पुणे विद्यापीठापासून स्वतंत्र होऊन जळगाव विद्यापीठाचा झालेला विकासक्रम देखील यावेळी त्यांनी मांडला. जळगाव विद्यापीठाचा नामविस्तार हा शांततेच्या आणि सामंजस्य पद्धतीने झाला, यावर त्यांनी विशेष भर दिला. उच्च शिक्षणाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. सोबतच बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले. बहिणाबाई चौधरी यांची कविता म्हणजे माणसापासून व्यक्तीपर्यंतचा प्रवास आहे, असे मत डॉ. बोरसे यांनी व्यक्त केले.
यावेळी बहिणाबाईंच्या कवितांची काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहिणाबाईलिखित कविता अभिवाचनात्मक पद्धतीने सादर केल्या. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून युवाकवी प्रा. तुषार पाटील व डॉ. जे. पी. महाजन उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम प्रणिता सोनवणे तर द्वितीय हर्षदा भदाणे हे पारितोषिक विजेते ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील खरे यांनी, सूत्रसंचालन डॉ. सुषमा तायडे यांनी तर आभार डॉ. डी. के. गायकवाड यांनी व्यक्त केले.
(फोटो)
विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. वळवी, उपप्राचार्य प्रा. एस. एस. पालखे, राष्ट्रीय छात्रसेनेचे १८ महाराष्ट्र बटालियन जळगावचे नायब सुभेदार अनिल कुमार, हवालदार विक्रम सिंग, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. अभिजीत जोशी, डॉ. गौरव महाजन, विद्यार्थी स्वयंसेवक, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.