धरणगाव (प्रतिनिधी) ह्या वर्षीच्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याच्या अनुषंगाने जलदूत फाऊंडेशन धरणगावतर्फे हरित-धरणगाव ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ह्या योजनेत स्वताच्या घराच्या आजूबाजूला वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यास इच्छुक व्यक्तींना जलदूत फाऊंडेशनतर्फे संपूर्ण वाढ झालेले प्रत्येकी एक रोप, संरक्षक जाळी आणि गांडूळ खत दिले गेले.
या योजनेत आतापर्यंत ४० झाडांचे दायित्त्व धरणगाव परिसरातील नागरिकांनी घेतले आहे. यातील १६ झाडे भोणे, ४ झाडे १३२ KV सबस्टेशन, १३ झाडे एरंडोल परिसर, ५ झाडे अमळनेर रोड वर लावलेली असून या झाडांची निगा राखून जोपासना करण्याची भूमिका या परिसरातील रहिवासी यांनी व्यक्तिगत घेतली आहे.
हरित-धरणगाव ह्या योजनेसोबतच जलदूत फाऊंडेशन धरणगाव संस्थेमार्फत दत्तक वृक्ष योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींना आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, विवाहप्रीत्यर्थ, वाढदिवसाच्या निमित्ताने, विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावता येईल. त्यासाठी रु. ११०० एवढी रक्कम जलदूत फाऊंडेशन धरणगाव ह्या संस्थेला देणगी स्वरुपात दिल्यास झाडाची देखभाल, मशागत, पाण्याची उपलब्धता याची संपूर्ण जबाबदारी जलदूत फाऊंडेशन धरणगावची राहील. आपल्या स्मृतींना मूर्तरूप देण्यासाठी जलदूत फाऊंडेशन धरणगावमार्फत देणगीदारांच्या/नातेवाईकांच्या नावाने एक पाटी झाडाच्या संरक्षक जाळीवर लावण्यात येईल, सोबत देणगीदाराचे नाव देखील राहील. या योजनेत देश-विदेशातून आत्तापर्यंत २४ व्यक्तींनी आपल्या आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ वृक्ष दत्तक घेतले असून हे वृक्ष पुढील ८ दिवसात रोपण करून त्यांच्या देखभालीची जवाबदारी जलदूत फाऊंडेशन घेणार आहे. सदर योजनेत ५० वृक्ष लावले जाणार आहेत.
जलदूत फाऊंडेशन धरणगावने गेल्या एक वर्षापासून मोरया नगर आणि रामकृष्ण नगर येथे एकूण ५० वृक्ष जगवले आहेत, आणि येत्या वर्षासाठी हरित-धरणगाव व दत्तक वृक्ष दोन्ही योजना मिळून एकूण १०० वृक्ष जगवण्याचा संकल्प केलेला आहे. तरी आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ वृक्ष दत्तक घेणेसाठी लवकरात लवकर योजनेत सहभागी होण्यासाठी प्रा. ए. आर. पाटील ९४२१५१२९७२ किंवा एस. एस. पाटील ७५८८६४६३६५ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे.
सदर योजना यशस्वी करणेसाठी संजय तोडे, संजय पाटील भोणे, चिंतामण पाटील भोणे, डॉ. शैलेश सूर्यवंशी, संतोष सोनवणे, पी डी महाजन, कन्हैय्या रायपूरकर, नितेश महाजन, डॉ. पंकज अमृतकर, डॉ. सूचित जैन, इंजी सुनील शाह, योगेश भाटीया, मनोज महाजन, डॉ. आशिष सूर्यवंशी, विक्रांत पाटील आदी परिश्रम घेत आहेत