धरणगाव (प्रतिनिधी) अवघ्या काही दिवसापूर्वी मोठ्या जोशात एकमेकाविरुद्ध दंड ठोकून लढणारे शिंदे आणि ठाकरे गट धरणगाव तालुका शेतकी संघाची निवडणूक एकत्र लढविण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परंतू याबाबत उघड कुणीही बोलायला तयार नाहीय. पण या निवडणुकीचे सर्वात धक्कादायक तंत्र म्हणजे…महाविकास आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांना या अकल्पित युतीबाबत सुगावा न लागू देता, हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच काय तर राष्ट्रवादीच्या संजय पवार यांच्या सौभाग्यवतीसह भाजपची एक महिलाही बिनविरोध झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
धरणगाव तालुका शेतकी संघामध्ये एकूण १५ जागा आहेत. याबाबत प्राथमिक बोलणीत अनेकांनी ही निवडणूक बिनबिरोध करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. पण शिंदे आणि ठाकरे गट एकत्र कसे येणार ?, याबाबत मंथन सुरु होते. परंतू धरणगाव तालुक्यातील ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन महत्वपूर्ण नेत्यांनी एकत्र युती करण्याची तयारी दाखवली. त्याला कारण म्हणजे धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही बाजूने मोठा आर्थिक बोजा पडला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत ठराविक नेत्यांनीच आर्थिक डोलारा सांभाळला होता. तर बहुतांश जणांनी हात वर केले होते.
धरणगाव तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत भाजप ४ , शिवसेना (शिंदे गट) ५, राष्ट्रवादी (संजय पवार गट) ३, सुरेश चौधरी (ठाकरे गट) ३, अशी वाटप ठरली असल्याचे कळते. परंतू याबाबत अधिकृत कुणीही बोलायला तयार नाहीय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या धर्मपत्नी सोनाल पवार (चांदसर) आणि भाजपच्या मानल्या जाणाऱ्या प्रतिभा दिनेश पाटील (भोणे) ह्या आज बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. अगदी या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटांना भाजपने टेकू दिला असल्याचेही चित्र समोर येत आहे.
धरणगाव तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत कट्टर दुश्मन समजले जाणारे शिंदे आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढत असल्याचे आज तरी स्पष्ट चित्र आहे.परंतू त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतील दोन घटक पक्ष एकत्र येऊन उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचेही कळते. त्यामुळं भविष्यात नेमकं काय होईल?, हे आता बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
धक्कादायक म्हणजे दोन्ही बाजूच्या अनेक मोठ्या नेत्यांना विचारात घेतले गेले नसल्यामुळे आज माघारीपूर्वी मोठी शाब्दिक चकमक झाल्याचेही कळते. आता पडद्याआड नेमक्या काय घडामोडी घडल्या किंवा घडताय, हे निकालानंतरचं स्पष्ट होऊ शकणार आहे. दरम्यान, सर्वपक्षीय पॅनल जर बनले तर त्याचे नेतृत्व पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार आणि धरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक सुरेशनाना चौधरी करतील असे कळते. त्यामुळं आगामी काळात मोठ्या घडामोडी बघायला मिळण्याची शक्यता वर्तली जात आहे. तर पक्षांतर्गत वादविवाद देखील समोर येण्याची शक्यता आहे.