जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी बँकेसाठी २१ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची सोमवार, ८ नोव्हेंबर म्हणजेच आज शेवटची मुदत आहे. २१ जागांसाठी एकूण १४९ उमेदवारी अर्ज कायम आहेत. दरम्यान आज माघारीनंतरच लढतींची स्थितीही स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते अनुकूल होते. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची समितीदेखील स्थापन करण्यात आली होती. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकांचे सत्रदेखील झाले. जागा वाटपावरून मात्र, कॉग्रेस बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीने देखील भाजपसोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे भाजप विरुद्ध महा विकास आघाडी दरम्यानच आता ही लढत होत आहे. त्यातदेखील कॉंग्रेस व राष्ट्रवादीत एका जागेवरून जागा वाटपाचे सूत्र ठरवलेले नाही. त्यामुळे दिवसभर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू होते.
दरम्यान, भाजप विरुद्ध महाविकास आघाडीदरम्यान लढत होणार असून, सोमवारी माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर सर्व लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. २१ पैकी ६ जागा बिनविरोध मानल्या जात आहेत. त्यामुळे माघारीनंतर अजून किती जागा बिनविरोध होतील, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मविआच्या ६ जागा बिनविरोध
निवडणुकीच्या माघारीआधीच महाविकास आघाडीच्या ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये बोदवड, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, पारोळा, मुक्ताईनगर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित १५ जागांसाठीच निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अशा परिस्थितीत भाजपला जिल्हा बँकेत सत्तेच्या गणितासाठी ११ जागा जिकाव्या लागणार आहेत. दरम्यान, सोमवारी माघारीनंतरच सर्व लढती स्पष्ट होणार आहेत.