भुसावळ (प्रतिनिधी) जिल्हा बँक निवडणुकीत मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. यासंदर्भात आता नाना पाटील यांनी जय माता दी पतसंस्थेच्या विरोधात भुसावळच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. भुसावळच्या जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व सचिव विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नाना पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, सन २०२१-२०२६ या कालावधीसाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याच मतदार संघातून एकनाथराव खडसे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जय मातादी अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटी लि. भुसावळ ता. भुसावळ जि. जळगाव या सोसायटीचा मी सभासद नव्हतो, मी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही व मी थकबाकीदार देखील नाही. मात्र मी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मी थकबाकीदार आहे असे कारण देऊन, माझा अर्ज बाद करण्यात आलेला आहे.
सदरच्या माझ्या या अर्ज बाद करण्याच्या कामात जय मातादी अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे व्यवस्थापक, चेअरमन विजय चौधरी (पूर्ण नाव माहित नाही) व सचिव यांनी संगनमताने खोटे कर्ज व थकबाकी दाखवून माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वरील लोकांनी माझा उमेदवारी अर्ज खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या गैरकृत्यांसंदर्भात माझी तक्रार असून वरील व्यक्तींविरुद्ध भा.दं. वी. क. ४६५, ४६८, ४२०, ३४ नुसार कडक फौजदारी कारवाई करण्यात यावी व मला न्याय देण्यात यावा, असे यात म्हटले आहे.
दरम्यान, भुसावळच्या जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय चौधरी (पूर्ण नाव माहिती नाही), व्यवस्थापक आणि सचिव यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या लोकांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी नाना पाटील यांनी या तक्रार अर्जात केली आहे. कर्जाची रक्कम २ लाख २ हजार ५०० आणि व्याज मिळून अंदाजे ३ लाख रुपयांची थकबाकी नाना पाटील यांच्याकडे असल्याचे या पतसंस्थेने दाखवले होते असे नाना पाटील यांचे म्हणणे आहे.