जालना (वृत्तसंस्था) भूमिगत नालीच्या बांधकामाची रक्कम अदा करण्यास परवानगी देण्यासाठी बीडीओंची सही लागत होती. या बदल्यात ग्रामसेवकाने बीडीओंची सही घेऊन देण्यासाठी सात हजारासह ब्लॅकडॉग दारूचे दोन खंबेही लाच म्हणून मागितल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सिद्धार्थ कृष्णा घोडके (वय- ४२ मांजरगाव ता. बदनापूर), पुष्पा महाजन अंबुलगे (वय- ४० रा. उजैनपुरी ता. बदनापूर) असे कारवाई झालेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत. या कारवाईनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील भूमीगत नाली बांधकामाला काही दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली होती. दरम्यान काम पूर्ण झाल्यामुळे एमबीवर व उर्वरित १ लाख ४८ हजार ४६७ रूपये मजुरांना व साहित्य देणाऱ्या दुकानदारांना रक्कम अदा करण्याच्या परवानगी पत्रावर गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते. गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन देण्यासाठी मांजरगाव येथील ग्रामसवेक सिद्धार्थ घोडके याने ‘तुमचं काम केलं आहे, त्यासाठी मला सात हजार रुपये द्यावे लागतील. तसेच ब्लॅक डॉगचे चार हजार रुपयांचे २ खंबे द्यावे लागतील’, असं म्हणून दारूची देखील मागणी केली.
यानंतर पथकाने २० जून रोजी मागणीबाबत पडताळणी केली. त्यावेळी मांजरगावचे ग्रामसेवक सिध्दार्थ घाेडके यांनी पंचासमक्ष तुमचे काम रिक्वेस्ट करून आणून दिले आहे. त्यासाठी ११ हजार रूपये द्यावे लागतील. ते शक्य नसेल तर सहा सात हजार रूपये लगेच द्यावे लागतील. नाही तर दोन ब्लॅक डॉगचे दोन हजारांना मिळणारे दोन खांबे द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यावेळी घोडके यांनी ग्रामसेविका अंबुलगे यांना बोलावून तुमचे किती पसेंटेज असते मॅडम सरपंचांना सांगा असे सांगितले. सदर लाच घेण्यासाठी ग्रामसेवक अंबुलगे यांनी एका लाखाचे बिलासाठी गटविकास अधिकारी मॅडम यांना ४ हजार रूपये आणि विस्तार अधिकारी यांना 1 ते 2 हजार रूपये द्यावे लागतात. तसेच क्लार्क यांना सुद्धा वेगळे ५०० रूपये द्यावे लागतात, असे म्हणून तक्रारदार यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली. यानंतर पथकाने २० जून रोजी मागणीबाबत पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचला असता हा सगळा प्रकार एसीबीच्या पंचांसमोर घडला. त्यामुळे लाचखोर ग्रामसेवक सिद्धार्थ घोडके आणि महिला ग्रामसेवक पुष्पा अंबुलगे यांच्यावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जालना अँटी करप्शन ब्युरो करत आहे. दरम्यान, लाचेच्या बदल्यात दारूचे दोन खंबे देण्याची मागणी करण्यात आल्याने या प्रकरणाची जिल्ह्यासह राज्यात जोरदार चर्चा आहे.