मुंबई (वृत्तसंस्था) “संजय राऊत यांनी आम्हाला दम दिला. त्यांना आम्हाला सांगायचं आहे की असे दम-बिम देण्याची भाषा करु नका. हे भाजप आहे. आम्ही इंदिरा गांधींना ऐकलं नाही, तर तुम्ही कोण आहात. असा सवाल करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला.
सर्व राज्य एका कुटुंबासाठी चालवलं जात आहे. तुम्ही कितीही दबाव आणला, तरी ही भाजप जनतेचा आवाज बुलंद करेल” असा इशारा भातखळकरांनी दिला. संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या १००-१२० जणांची यादी केंद्र आणि ईडीकडे पाठवण्याचा इशारा दिला होता. “महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी दमबाजीची भाषा करतात. आम्ही तुमच्या अंगावर येऊ, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत, असं मुख्यमंत्री म्हणतात. मी त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो की आज संविधान दिवस आहे. कायद्याचे राज्य आहे, त्यांचं नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा करणे गैर तर आहेच, पण १०० टक्के घटनाविरोधी आहे” असंही भातखळकर म्हणाले. मुख्यमंत्रिपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे “आमच्या अंगावर येणाऱ्यांना सांगू इच्छितो, की तुम्हाला देखील मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाही. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो” असं म्हणताना पाहायला मिळतं.
“देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सगळा वृत्तांत सांगितला आहे. शरद पवार यांनी सरकार बनवण्यास सोबत येण्याचं मान्य केलं होतं. काळाच्या ओघात या सर्व घटना उघड होतील. शरद पवार यांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची आहे” असा घणाघातही अतुल भातखळकरांनी केला. ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकातून लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची इन्साईड स्टोरी सांगितली. यावर भातखळकरांनी भाष्य केले.