जळगाव (प्रतिनिधी) अपघात होवून जखमी झालेल्या पुतण्याच्या भेटी जात असलेल्या दाम्पत्याला भरधाव कंटेनरने वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पुष्पा गुणवंत पाटील (वय ६६, रा. प्रेमनगर) या ठार झाल्या. तर त्यांचे पती गुणवंत पाटील (वय ७०, रा. प्रेमनगर) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय आयटीआय जवळ झाला.
अपघातात जखमी झालेल्या पुतण्याच्या भेटी जात असतांना झाला अपघात !
शहरातील प्रेम नगरात गुणवंत पाटील हे वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला भेटण्यासाठी गुणवंत पाटील हे पत्नी पुष्पा पाटील यांना घेवून ते दुचाकीने कोल्हे नगरमध्ये जात होते. राष्ट्रीय महामार्गावर आयटीआय जवळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला (डबल्यूबी ११ एफ ३०९६) क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने धडक दिली. धडक लागताच दुचाकीस्वार पाटील दाम्पत्य खाली पडले.
जिल्हा रुग्णालयात केले दाखल !
अपघात झाल्याचे लक्षात येताच त्याठिकाणाहून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी जखमी झालेल्या पाटील दाम्पत्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या रुग्णालयात गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले. तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषित केले. मयत पुष्पा पाटील यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. त्यांचा मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे.
पहाटेच निघाले होते दाम्पत्य !
महामार्गावर सकाळच्या सुमारास वर्दळ कमी असल्यामुळे ते सकाळीच अपघातात जखमी झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी दुचाकीने निघाले. मात्र. काळाने घात केलाच. राष्ट्रीय महामार्ग सहावर सकाळीच दाम्पत्याला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने पुष्पा पाटील यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच तेथून काही अंतरावरच भरधाव ट्रकने वृद्धाला चिरडले.