धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी परिसरात मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या वीज खंडित समस्येमुळे उद्योग क्षेत्र अक्षरशः कोलमडण्याच्या स्थितीत आले आहे. एक्सप्रेस फीडर असूनही वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने येथील कंपन्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.
या परिसरात जैन, बॉश सारख्या नामांकित कंपन्यांसह साधारण पंधरा ते वीस छोटे-मोठे उद्योग कार्यरत आहेत. सुमारे दोन हजारांहून अधिक मजूर या उद्योगांमध्ये काम करत असून वीज समस्येमुळे त्यांच्या रोजगारावरही संकट ओढवले आहे. उत्पादन घटल्याने कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारावरही परिणाम होत असल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे, उद्योजकांकडून वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. परिणामी, पारधी परिसरातील उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून तात्काळ सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे.

















