
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांचे वीजप्रश्न तत्परतेने सोडवण्यात येतील. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतील, अशी ग्वाही महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिली.
महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात रविवारी (6 सप्टेंबर)आयोजित बैठकीत औंढेकर यांनी उद्योजकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता संजय सरग, प्रभारी अधीक्षक अभियंता चेतन नंदनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जळगाव जिल्ह्यातील उद्योजक प्रत्यक्ष तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजक व्हीसीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
यावेळी महावितरण आणि उद्योजकांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नरडाणा, नवापूर, भुसावळ, जामनेर, चाळीसगाव या औद्योगिक क्षेत्रातील वीज पायाभूत सुविधा, दर्जेदार वीजपुरवठा, फीडर व उपकेंद्रांची क्षमता, व्होल्टेजची गुणवत्ता, नवीन उद्योगांना वीज जोडणी आणि भविष्यातील वाढत्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व औद्योगिक वसाहतींना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा व सेवा देण्याच्या दृष्टीने 33 केव्हीच्या नवीन उपकेंद्रासाठी औद्योगिक ग्राहकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास तत्परतेने उपकेंद्र उभारण्याच्या हालचालींना वेग देऊ, असे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी सूचित केले. औद्योगिक ग्राहकांच्या वीज सेवेत हयगय खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देताना संचालक औंढेकर यांनी वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे कारण शोधून त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे तसेच गरज असेल त्या ठिकाणी वाहिनी विलगीकरणाची कामे करण्याचे निर्देश दिले. जळगाव एमआयडीसीत काही उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात आलेली आहे. प्रस्तावित दोन उपकेंद्रांच्या जागा प्राप्त असून, दोन उपकेंद्रांच्या जागांसाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर ही उपकेंद्रे उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांनी दिले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही आवश्यक तेथे उपकेंद्र, क्षमतावाढ व वाहिनी विलगीकरणाची कामे करून उद्योगांना अविरत वीज देण्याचे आश्वासन औंढेकर यांनी दिले.
जळगाव परिमंडलातील उद्योजकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास पसंती दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच स्मार्ट मीटर बसवल्यानंतर येणाऱ्या बिलांच्या अडचणीबाबत एनसीसी एजन्सीने दर आठवड्याला मेळावे घेऊन ग्राहकांच्या तक्रारी सोडवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. संचालक पदावरील अधिकाऱ्याने जळगावात येऊन उद्योगांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्याची ग्वाही दिल्याबद्दल उद्योजकांनी बैठकीत समाधान व्यक्त केले.
















