
जळगाव (प्रतिनिधी) – विवेकानंद प्रतिष्ठान माध्यमिक विद्यालय, वाघनगर येथे इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महावितरणच्या वतीने ऊर्जा जागृती कार्यक्रम शनिवारी (१९ सप्टेंबर) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ऊर्जा संवर्धन, वीज बचत, सौरऊर्जा आणि विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल पाटील, उच्चस्तर लिपिक नितीन रामकुवर यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऊर्जा वापराबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. ऊर्जा संवर्धन व ऊर्जेचा कार्यक्षम वापर, स्मार्ट सोलर योजना व सौरऊर्जेचे महत्त्व, वीज बचत व सुरक्षित वीज वापर, विद्युत अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, नवीकरणीय ऊर्जेचा वापर व पर्यावरण संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वीज वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही माहिती देण्यात आली. विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच ऊर्जा बचतीची सवय, सौरऊर्जेचा प्रभावी वापर आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ऊर्जा बचत, सौरऊर्जा आणि विद्युत सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
















