
यावल (प्रतिनिधी) – शहरातील एका तरुणाने तालुक्यातील एका गावातील तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. दरम्यान मुलीने कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबाने या मुलाच्या कुटुंबाला जबर मारहाण केली. तसेच प्रेमविवाह केलेल्या त्या तरुणीला जबरदस्तीने एका कारमध्ये बसून तिला पळून नेत तिचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
यावल शहरातील धनगर वाड्यातील रहिवाशी पार्थ संदीप सोनवणे (वय २३) या तरुणांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने तालुक्यातील एका गावातील तरुणीसोबत प्रेम विवाह केला होता. आणि प्रेम विवाह करून हे दोघे मंगळवारी धनगर वाड्यात आपल्या घरी परतले होते. त्यावेळी त्यांच्या घरी ब्रिझा कार घेऊन पाच जण आले आणि त्यांनी त्यांच्याशी वाद घालून मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याच्या रागातून तिला देखील मारहाण केली. पार्थ सोनवणे, संदीप सोनवणे यांनाही मारहाण आणि शिवीगाळ केली व जबरदस्तीने मुलीला कारमध्ये डांबून जबरदस्तीने घेऊन जात तिचे अपहरण केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगल, अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुनील पाटील करीत आहे.
शहरात घडलेल्या या घटनेमुळे एकचं खळबळ उडाली होती. शहरातील मध्यवस्तीत धनगर वाडा असून तेथे हा प्रकार घडला व भरधाव वेगात कार शहरातून निघाली. सर्वत्र आरडा ओरड होत असल्याने नेमका वाद कशावरून होत आहे हे नागरिकांना कळनासे झाले होते.
















